तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश सुखदेव कदम यांना शिवचरित्राचा अभ्यास करताना शिवरायांच्या जीवनात अष्टयोगाला योगायोगाने महत्त्वाचे स्थान असल्याचे आढळले. शिवरायांच्या जीवनावरील ११२ चरित्र ग्रंथांचे संशोधन करून त्यांनी शिवरायांच्या जीवनातील अष्टयोगाच्या ११६ घटना शोधून काढून, ‘अष्टयोगात शिवराय’ हा अभिनव ग्रंथ लिहून प्रकाशित केला आहे. आज शिवरायांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने, त्या ग्रंथाविषयी... ...........
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराजांना समर्थ रामदासांनी पाठवलेले पत्र शिवरायांच्या जीवनाचा वेध घेऊन त्यांच्या स्वराज्यस्थापनेच्या यशाचे सूत्र सांगणारे आहे. शिवरायांनी मुघल आणि यवनी सत्तांशी झुंजून स्वराज्याची स्थापना केली. रयत आणि राजा यांच्यात एकरूपता, समरूपता निर्माण करणारा असा त्यांचा राज्यकारभार होता. त्यामुळेच हे स्वराज्य राजाचे नव्हे, तर सर्वसामान्य रयत आणि जनतेचे होते. ‘श्रीमान योगी’ अशा शब्दात समर्थ रामदासांनी श्री शिवचरित्राचे सार सांगितले आहे. राज्यकारभार कसा करावा याचा उपदेश छत्रपती संभाजी महाराजांना करताना त्या पत्रात ते म्हणतात,
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप
भूमंडळी
शिवरायांचे सारे जीवन संघर्षमय होते आणि ते स्वराज्य-रयतेसाठीच समर्पित झाले होते. शिवरायांची अनेक चरित्रे इतिहासकारांनी लिहिली असली, तरी भूतलावरच्या आतापर्यंत झालेल्या राजात शिवराय हे सर्वार्थाने एकमेवाद्वितीय होते. त्यांच्या जीवनातले अनेक पैलू अद्यापही प्रकाशात आलेले नाहीत. फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्टवर १० हजारांहून अधिक चरित्रे आणि ऐतिहासिक ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्या तुलनेने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर लिहिल्या गेलेल्या ग्रंथांची आणि संशोधनपर ग्रंथांची संख्या कमीच आहे.
शिवचरित्राचे संशोधन करणाऱ्या नव्या पिढीतल्या इतिहासाच्या अभ्यासकांनी शिवरायांचे व्यवस्थापन, राज्यकारभार, लष्करी मोहिमा, महसुली प्रशासन, युद्धनीती, अर्थकारण अशा विविध पैलूंवर नव्याने प्रकाशझोत टाकला आहे. तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश सुखदेव कदम यांनी ‘छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा’ या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. शिवचरित्राचा अभ्यास पुढे सुरू ठेवताना त्यांना शिवरायांच्या जीवनात अष्टयोगाला योगायोगाने महत्त्वाचे स्थान मिळाल्याचे आढळले. शिवरायांच्या जीवनावरील ११२ चरित्र ग्रंथांचे संशोधन करून त्यांनी शिवरायांच्या जीवनातील अष्टयोगाच्या ११६ घटना शोधून काढून, ‘अष्टयोगात शिवराय’ हा अभिनव ग्रंथ लिहून प्रकाशित केला आहे.
शिवरायांच्या जीवनात आठ या संख्येचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे त्यांना आढळले. त्यांचे अष्टप्रधान मंडळ, सिंहासन, समाधी यातही आठ ही संख्या यावी, हा योगायोग नसावा, असे त्यांना वाटते. शिवरायांच्या जीवनातील घटनांच्या तारखा किंवा बेरजेत आठ हाच आकडा ११६ घटनांत आल्याचे त्यांनी ऐतिहासिक आधार आणि पुराव्याद्वारे सिद्ध केले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा आठ दिवस चालला, शिवरायांच्याच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखेत आठ ही संख्या येते, त्यांना आठ पत्नी होत्या. मुलेही आठ होती. त्यांची राजमुद्रा अष्टकोनी, राजधानी रायगडच्या नगारखान्याची उंची सतरा मीटर, गंगासागर तलावाच्या लांबी-रुंदीही आठ, कारकीर्द ३५ वर्षे, औरंगजेबाची स्वराज्यावरची स्वारी २६ वर्षे, शिवरायांच्या निर्वाणावेळी मराठी साम्राज्याचा विस्तार ८० हजार मैल होता. शिवरायांचे आयुष्य १८ हजार ३०६ दिवस होते. मुघलांच्या ताब्यातून रायगड ४४ वर्षांनी स्वराज्यात आला. शिवरायांची आग्र्यातून सुटका झाली तो दिवस १७ ऑगस्ट १६८८, सुरतेच्या स्वारीत महाराजांनी ५३ लाख रुपयांची लूट केली. सरसेनापती प्रतापराव गुजर यांना २४ फेब्रुवारी १६७४ रोजी वीरमरण आले. शिवरायांच्या पन्हाळगडावरील वास्तव्याचे दिवस ६४७ होते. शिवरायांचा पहिला इंग्रजी चरित्रकार ग्रँट डफ यांना ‘हिस्ट्री ऑफ मराठा’ या ग्रंथाच्या प्रकाशनात सतराशे पौंडाचे नुकसान सोसावे लागले.
शिवरायांच्या जीवनातील घटनांच्या तारखांच्या बेरजेत आणि त्यांच्या निर्वाणानंतरच्या घटनांच्या संख्यांच्या बेरजेतही आठ हीच संख्या येते. अष्टभुजा श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. त्यांच्या जीवनात आठ हा अंक कसा येतो, याचा शोध प्रा. सतीश कदम यांनी चिकाटीने संशोधनपूर्वक घेतला आणि त्यावर पुराव्यासह ग्रंथ लिहिला, हे विशेष. शिवरायांच्या जीवनातील या नव्या संकल्पनेवर प्रकाशझोत टाकल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! यापुढेही त्यांनी छत्रपती शिवचरित्राच्या जीवनातील दुर्लक्षित राहिलेल्या घटनांचा शोध घ्यावा, संशोधन करावे, ही अपेक्षा!
- वासुदेव कुलकर्णी(
‘अष्टयोगात शिवराय’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’ वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)