दापोली : तालुक्यातील जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठानतर्फे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्रपालीच्या आमराईत दोन दिवसीय धम्माल शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मुलांनी वेगवेगळ्या विषयांची माहिती घेत बिनभिंतीच्या शाळेचा अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या जाणीवजागृतीचे बीजारोपण करण्यासाठी प्रतिष्ठानमार्फत सुट्टीमध्ये दर वर्षी शिबिर आयोजित केले जाते. या वर्षी दिवाळी सुट्टीत स्वसंरक्षण आणि पर्यावरणरक्षण या विषयांतर्गत ‘नव्या वाटा नव्या दिशा’ हे धम्माल शिबिर घेण्यात आले. शिबिरार्थींच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि भूमिवंदना करून शिबिराला सुरुवात झाली.
पहिल्या दिवशी स्वसंरक्षण विषयांतर्गत सुरेंद्र शिंदे यांनी योगासने आणि कराटेची प्रात्यक्षिकांसह ओळख करून दिली. त्यानंतर अस्मिता परांजपे यांनी अभिव्यक्ती प्रकटीकरण या विषयाची गप्पांच्या माध्यमातून ओळख करून दिली. पर्यावरणावर बोलू काही या विषयाची माहिती घेण्यासाठी शिबिरार्थींनी इकोफ्रेंडली परांजपे संग्रहालयाला भेट दिली. यात प्लास्टिक कचऱ्यापासून केलेले बाकडे, कंपाउंड वॉल, गुढी, वीट आदी वस्तूंची माहिती घेतली. कचरा म्हणजे दुसरी वस्तू बनवण्याचा कच्चा माल असतो, त्यामुळे तो फेकून न देता कचरा संकलन केंद्रात जमा करण्याविषयी मुलांना सांगण्यात आले. शारीरिक ताकदीबरोबर मानसिकदृष्ट्याही सक्षम असायला हवे, या हेतूने दुपारच्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक माधव गवाणकर यांनी ‘मनातील भीती’ या विषयावर मुलांशी गप्पा मारल्या. याबरोबरच संगीतखुर्ची स्पर्धेत सहभागी होतानाच रिव्हर क्रॉसिंग, लगोरी, रस्सीखेच या सांघिक खेळांची मजा लुटली.
दुसऱ्या दिवशी जलसाक्षरता विषयांतर्गत गिम्हवणे उगवतवाडी येथील झऱ्याची माहिती घेऊन त्याची स्वच्छता केली.
(याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.) यानंतर श्री. ताम्हणकर यांनी ठसाचित्रांचे प्रशिक्षण दिले. दुपारच्या सत्रात देवरुख येथील राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचे युयुत्सू आर्ते यांनी ‘आपत्कालीन व्यवस्थापन’ विषयावर मुलांशी संवाद साधला. या वेळी देवरुख येथून प्रमोद हर्डीकर, सुरेंद्र माने, वैभव सुर्वे, राजू वणकुंद्रे आणि रंजना कदम उपस्थित होत्या.
या वेळी ‘टाकाऊतून टिकाऊ’चे ज्ञान मिळण्यासाठी अरुण पुळेकर यांनी मुलांना बिनटाक्याची पिशवी आणि प्लास्टिक बाटल्यांचे हँगिंग शिकवले. समारोपप्रसंगी बीजारोपण आणि सेंद्रीय शेती व कचऱ्याचा वापर याबाबत माहिती देण्यात आली. या वेळी तहसीलदार कविता जाधव, पंचायत समिती सदस्य श्री. मनोज आणि जालगाव ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी सुरेंद्र शिंदे, रत्नेश आंबेरकर, श्री. संजय, अस्मिता परांजपे, प्रशांत परांजपे यांनी मेहनत घेतली.