गुरुचरित्रातील श्रीदत्त, श्रीपादवल्लभ, श्रीनृसिंह या पुढील अवतार अक्कलकोटस्थित श्री स्वामी समर्थ यांचा मानला जातो. स्वामींचे पद्यातील चरित्र गद्यात आणण्याचे काम १९०४मध्ये प्रथम झाले. कै. रा. रा. सदाशिव वामन मराठे कृत स्वामी महाराजांचे पहिल्या गद्य चरित्राचे संकलन ‘श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र’ यातून विवेक दिगंबर वैद्य यांनी केले आहे.
मूळ ग्रंथातील लेखन यात जसेच्या तसे घेत अनेक प्रसंगांचे योग्य संदर्भ तसेच छायाचित्रांची यात भर घातली आहे. १८४६-४७मध्ये चिंतोपंतअप्पा टोळ हे सोलापूरला मामलेदार असताना त्यांची व महाराजांची पंढरपूरला गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटला आले, या हकीकतीने चरित्राला प्रारंभ झाला आहे.
महाराजांचे वर्णन, त्यांचा राग, दर्शनाची पद्धत, त्यांची अचाट कृत्ये व चमत्कार, विविध ठिकाणच्या वास्तव्याच्या वेळच्या घटना, स्वामींचे भक्त, सेवेकरी, राजे-रजवाड्यांनी महाराजांची केलेली सेवा, प्रसंगी महाराजांनी एखाद्याचे केलेले गर्वहरण, सन्मार्गाचा संदेश आदी कथा यात वाचायला मिळतात. स्वामींच्या अवताराच्या कार्यसमाप्तीच्या वर्णनाने या चरित्राची सांगता होते.
पुस्तक : श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीमहाराज यांचे सचित्र व साग्र चरित्र
लेखक : विवेक दिगंबर
प्रकाशक : पुनर्वसू प्रकाशन
पाने : २४४
किंमत : २५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)