‘आपले विचार आपल्याला घडवतात,’ ‘सुंदर अक्षर हाच खरा दागिना’ असे अनेक सुविचार आपल्याला शाळेत असताना शिक्षकांनी शिकवलेले असतात. विद्यार्थ्यांनी ते विचार प्रत्यक्षात उतरवावेत, म्हणून त्यांनी परिश्रम घेतलेले असतात. शाळेत गिरवलेल्या या धड्यांमुळेच विद्यार्थी मोठे होतात आणि नाव कमावतात.
म्हणूनच विद्यार्थ्याने जीवनात उत्तुंग कामगिरी केल्यावर आपल्या शिक्षकांकडून किंवा आपल्या शाळेकडून कौतुकाची थाप पाठीवर पडली, तर तो त्याला मोठा गौरव वाटतो. नेमका हाच अनुभव कवी, संगीतकार, गायक आणि चित्रकार असलेले मिलिंद जोशी यांना नुकताच आला आहे. ‘असंच होतं ना तुलाही’ हा मिलिंद जोशी यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला काव्यसंग्रह डिसेंबर २०१९मध्ये ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे प्रकाशित झाला. कवीच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील कवितासंग्रह प्रकाशित होण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे. सहज-सोप्या शब्दरचनेत मोठे सार असलेल्या आणि गेयता असलेल्या त्यांच्या कविता मनाचा ठाव तर घेतातच; पण त्यांचे मोत्यासारखे सुंदर हस्ताक्षरही लक्ष वेधून घेते. त्यांच्या या कवितासंग्रहाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दादरच्या बालमोहन विद्यामंदिर या सुप्रसिद्ध शाळेचे उपमुख्याध्यापक सदाशिव पाटील यांनीही मिलिंद जोशी यांना नुकतेच पत्र पाठवून त्यांच्या कवितांचे आणि हस्ताक्षराचे कौतुक केले. मिलिंद जोशी या शाळेचे विद्यार्थी नाहीत. तरीही ‘बालमोहन’सारख्या नामवंत शाळेकडून आवर्जून दखल घेतली जाणे महत्त्वाचे आहे. पाटील सरांनी पाठवलेले पत्र येथे प्रसिद्ध करत आहोत...
(‘असंच होतं ना तुलाही’हा कवितासंग्रह घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. त्याचे ऑडिओबुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)