लहानपणापासून लेखणीशी जोडलेले सख्य कायम टिकून राहिलेले व त्या लेखणीतून व्यवसायाकडे वळलेले साहित्यिक, प्रकाशक म्हणजे राजेंद्र बनहट्टी. बनहट्टी घराण्यात लेखनाची परंपरा होती. त्यामुळे लहान वयातच कथालेखनाचे बीज राजेंद्र बनहट्टींमध्ये रुजले. पुण्यात वडिलांनी सुरू केलेल्या प्रकाशन संस्थेचा कारभार पाहू लागल्यावर त्यांची साहित्यिक मुशाफिरी जोमाने सुरू झाली. याबद्दलचे अनुभव त्यांनी ‘पांढऱ्यावरती काळे’ यामध्ये कथन केले आहे.
आत्मचरित्रपर लिखाण या पुस्तकातील एक भाग आहे. गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेले विविध विषयांवरील त्यांचे लेख यात संपादित स्वरूपात प्रसिद्ध केले आहे. यात साहित्य आणि साहित्यिक या भागात त्यांनी मराठी कथेच्या जन्मापासून तिचा स्फुट कथा ते नवकथा हा प्रवास, कथाकार आचार्य अत्रे, नवकथाकार पु. भा. भावे, अरविंद गोखले, शंकर पाटील, चरित्रकार न. चिं. केळकर, ऐतिहासिक कादंबरीचे निर्माते ना. सं. इनामदार अशा अनेक साहित्यिकांची चित्रण यात आहेत. या शिवाय, मराठी भाषेची गळचेपी, मराठीवर हिंदीचे आक्रमण, अक्षर वाङ्मय आदी लेखही आहेत.
प्रकाशन : सुविचार प्रकाशन मंडळ
पृष्ठे : ३३८
मूल्य : ५०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)