‘ज्ञानाच्या बाबतीत एक मौज असते ती अशी, की त्यात शिळेपणा नसतो नि नित्य नूतन असे नेहमीच अभ्यासू मनाला शिकायला मिळते,’ असे म्हणणाऱ्या मराठी साहित्यविश्वातल्या ज्येष्ठ विदुषी दुर्गाबाई भागवत आणि ‘शिरीष’ नावाने कविता करणारे श्रीकांत नारायण आगाशे यांचा दहा फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमिताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी.... .........
दुर्गा भागवत
दहा फेब्रुवारी १९२० रोजी इंदूरमध्ये जन्मलेल्या दुर्गा भागवत या मराठी साहित्यविश्वात मानाचं स्थान असणाऱ्या ज्येष्ठ लेखिका! आपल्या ९२ वर्षांच्या दीर्घायुष्यात त्यांनी लोकसाहित्य, कथा, चरित्र, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक, बालसाहित्य, ललित, बौद्धसाहित्य अशा विविध प्रकारांवर अत्यंत कसदार आणि विपुल लेखन केलं आहे. फ्रेंच, जर्मन, संस्कृत भाषा चांगल्या अवगत असणाऱ्या दुर्गाबाईंनी संस्कृत, पाली आणि इंग्लिशमध्येही लेखन केलं आहे.
सागर, बिलासपूर, रायपूर यांसारख्या ठिकाणचं आदिवासी जीवन जवळून पाहून त्यांनी त्यांचे सण-उत्सव, प्रथा-समजुती, गाणी अशी माहिती गोळा करून शोधनिबंध लिहिले.
हेन्री डेव्हिड थोरोच्या ‘वॉल्डन’चं त्यांनी केलेलं सुरेख भाषांतर ‘वॉल्डनकाठी विचार-विहार’ हे प्रचंड गाजलं होतं.
त्यांनी वेळोवेळी सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय प्रश्नांसंबंधी भूमिका घेतली आणि आपली ठाम मतं निर्भीडपणे मांडली. ‘जीवनातल्या प्रत्येक प्रश्नासंबंधी माणसाने भूमिका घेतली पाहिजे, विशेषतः कलावंत- साहित्यिकांना आपली भूमिका असली पाहिजे आणि वेळप्रसंगी ती त्यांनी ठासून मांडली पाहिजे,’ असं त्यांचं म्हणणं असायचं.
१९७५ साली कऱ्हाडमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
महानदीच्या तीरावर, व्यासपर्व, पैस, ऋतुचक्र, खमंग, आठवले तसे, बाणाची कादंबरी (भाग १/२), बंगालच्या लोककथा, भावमुद्रा, दख्खनच्या लोककथा, दुपानी, कथासरित्सागर खंड १ ते ५, लोककथा माला संच, लोकसाहित्याची रूपरेखा, पाली प्रेमकथा, प्रासंगिका, पंजाबच्या लोककथा, संताळच्या लोककथा : भाग १, २, ३, साष्टीच्या गोष्टी, सिद्धार्थ जातक - सात खंड एकत्रित, तमिळ लोककथा (भाग १ ते ३), आसामच्या लोककथा, आस्वाद आणि आक्षेप, भारतीय धातुविद्या, डांगच्या लोककथा, गुजरातच्या लोककथा, काश्मीरच्या लोककथा (भाग १ आणि २), काँकॉर्डचा क्रांतिकारक, रसमयी, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
सात मे २००२ रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं.
(दुर्गा भागवत यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/i9dvw2 येथे क्लिक करा.)...........
श्रीकांत नारायण आगाशे
१० फेब्रुवारी १९२४ रोजी जन्मलेले श्रीकांत नारायण आगाशे हे कवी आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात.
ते ‘शिरीष’ या टोपणनावाने काव्यलेखन आणि ‘श्रीकांतराय’ या टोपणनावाने गद्यलेखन करत असत.
सरोजिनी, कुजिते आणि गर्जिते, जीवनाचा फेस उठला, गगनाला गवसणी, विश्वाच्या कळसावर, कोनटीकी, दक्षिण धृवाची क्षितिजे, पर्वताची एक हाक असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
पाच नोव्हेंबर १९८६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.