‘बदनशिबाचा पाऊस, त्यात चौमुलखी वादळे, अवघ्या हिरव्या रानात-कुणी उगाच उभा जळे’ म्हणणारे कवी नामदेव ढसाळ आणि ज्येष्ठ संगीत समीक्षिका आणि लेखिका शांता निसळ यांचा १५ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय... .....
नामदेव लक्ष्मण ढसाळ
१५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुण्यात जन्मलेले नामदेव लक्ष्मण ढसाळ हे कवी, लेखक, कादंबरीकार आणि नाटककार अशा विविध पैलूंनी प्रसिद्ध असणारे दलित चळवळीमधले ज्येष्ठ नेते. मुंबईतल्या अत्यंत गरीब आणि बकाल भागात बालपण घालवल्याने त्यांनी दारिद्र्य आणि ससेहोलपट जवळून पाहिली आणि आपल्या विशिष्ट भाषेतून त्यांनी ते दलितांचं आयुष्य शब्दबद्ध केलं.
एकीकडे ‘दलित पँथर’सारख्या उग्रवादी चळवळीतून जहाल आंदोलनं करत त्यांनी विद्रोही कविता आणि लेख लिहिणं चालू ठेवलं होतं.
चिंध्यांची देवी आणि इतर कविता, गोलपिठा, हाडकी हाडवळा, गांडू बगीचा, खेळ, मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे!, निर्वाणा अगोदरची पीडा, सर्व काही समष्टीसाठी, या सत्तेत जीव रमत नाही, तुझे बोट धरुनी चाललो आहे मी, आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट, तुही यत्ता कंची? तुही यत्ता..., दलित पँथर एक संघर्ष, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
१५ जानेवारी २९०१४ रोजी त्यांचा मुंबईत मृत्यू झाला.
(नामदेव ढसाळ यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) ...............
शांता हरी निसळ
१५ फेब्रुवारी १९२८ रोजी पुण्यात जन्मलेल्या शांता निसळ या ज्येष्ठ संगीत समीक्षिका, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहेत. संगीत विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती.
महिलांच्या विजिगिषु वृत्तीवर त्यांनी कथालेखन केलं आहे. त्यांच्या ‘बेघर’ या कादंबरीवर ‘उंबरठा’ हा प्रसिद्ध सिनेमा बनला आणि गाजला.
धडपड्या आणि बंडखोर स्वभावाच्या शांता यांनी आपले वडील व्यंकटेश जोशी यांच्या पाठिंब्यामुळेच स्वतःला घडवलं अशी आठवण सांगितली आहे. विद्यार्थिदशेत त्यांनी ‘चले जाव’ चळवळीतही भाग घेतला होता.
आहुती व एकलव्य, उंबरठा, मृत्यू माघारी गेला, विमुक्ता, विसंवाद – अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
सात मे २०१३ रोजी त्यांचं निधन झालं.