ज्येष्ठ नाटककार आणि कथाकार रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी रात्री उशिरा करोनामुळे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मराठी साहित्य आणि नाट्य क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या कारकिर्दीचा हा अल्प आढावा...
.........
१७ नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबईत रत्नाकर मतकरी यांचा जन्म झाला. लेखक आणि मराठी रंगभूमीवरचे एक श्रेष्ठ नाटककार, दिग्दर्शक म्हणून ते सुपरिचित होते. गूढकथा, भयकथा, नाटकं, बालनाट्य आणि संगीतिका लिहून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या संस्थेतून कामं करून दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, अजय वढावकर, सुप्रिया मतकरी अशा अनेक कलाकारांनी पुढे रंगभूमी गाजवली.
त्यांनी वयाच्या १७व्या वर्षीच लिहिलेली ‘वेडी माणसं’ ही एकांकिका ‘ऑल इंडिया रेडिओ’वरून प्रसारित झाली होती. त्यांची सुमारे ९० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्याशिवाय अनेक पुस्तकं अप्रकाशितही आहेत.
लोककथा ७८, दुभंग, जावई माझा भला, अश्वमेध, घर तिघांचे हवे, चार दिवस प्रेमाचे, अजून यौवनात मी, खोल खोल पाणी, करता करविता, चि. सौ. कां. चंपा गोवेकर, जादू तेरी नजर, प्रियतमा, शूऽऽ कुठं बोलायचं नाही, स्पर्श अमृताचा, साटंलोटं, आरण्यक, इंदिरा, एकदा पहावं करून, माझं काय चुकलं, अशी नाटकं त्यांनी लिहिली होती. त्या नाटकांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय अचाट गावची अफाट मावशी, अलबत्या गलबत्या, निम्माशिम्मा राक्षस, सरदार वाकडोजी फाकडे, इंद्राचे आसन आणि नारदाची शेंडी, धडपडे, बडबडे, मारकुटे आणि कंपनी अशी त्यांची बालनाट्यंही प्रचंड गाजली. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी ‘नाटक’ शिकवले. २००१मध्ये पुण्यात झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
ऐक टोले पडताहेत, अंश, अंतर्बाह्य, बारा पस्तीस, गहिरे पाणी, इन्व्हेस्टमेंट, माणसाच्या गोष्टी, मृत्युंजयी, निजधाम, परदेशी, संभ्रमाच्या लाटा, संदेह, अपरात्र, एक दिवा विझताना, फाशी बखळ, जौळ, कबंध, खेकडा असे त्यांचे कथासंग्रहही लोकप्रिय आहेत.
गूढकथालेखन हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांनी आपल्याच ‘संगीत प्रेमकहाणी’ नाटकावर बेतलेली ‘बेरीज वजाबाकी’ ही मराठी मालिका आणि ‘गहिरे पाणी’ ही गूढकथांवर आधारित मालिका प्रचंड गाजली होती. मुंबई दूरदर्शनवर गाजलेल्या ‘गजरा’ कार्यक्रमात त्यांचं मोठं योगदान होतं.
त्यांना अखिल भारतीय मराठी परिषद, नाट्यदर्पण, अत्रे फाउंडेशन, संगीत नाटक अकादमी अशा अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कारही त्यांना २०१८मध्ये मिळाला होता.
त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य, नाट्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
हेही जरूर वाचा :
स्वातंत्र्याची मोठी किंमत कलावंताला द्यावी लागते : रत्नाकर मतकरी
(रत्नाकर मतकरी यांच्या तारकर या कथेचा रसास्वाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(मतकरी यांच्या
‘ऐक, टोले पडताहेत’ या कथेच्या अभिवाचनाचा व्हिडिओ पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.)
(रत्नाकर मतकरी यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.)